अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून निर्माण केला सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा समारोप
Summary
ठाणे, दि.१८ (जिमाका): मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे, ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य […]
ठाणे, दि.१८ (जिमाका): मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे, ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ सांगता समारंभात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे. “महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” हा महाराष्ट्राचा जयघोष असून, मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे.
१०५ दिवस चाललेल्या अभियानातून १ लाख २५ हजार रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली. “लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी…” या ओळी उद्धृत करत त्यांनी मराठी ही अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोली असल्याचे सांगितले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकविण्याचा मार्ग स्वीकारल्याचे कौतुक करत, “कायद्याने नाही, प्रेमाने भाषा शिकते,” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत, लेक लाडकी आणि आईचे नाव अधिकृत नोंदीत देण्याचे निर्णय घेतल्याचे सांगितले.

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्थापन झालेल्या धर्मवीर आनंद दिघे महामंडळाचा ५० कोटींचा निधी भविष्यात १,००० कोटींवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र उद्योग, स्टार्टअप, जीडीपी आणि परदेशी गुंतवणुकीत अव्वल असून दावोसमध्ये ३ व ४ लाख कोटींचे सामंजस्य करार झाल्याचेही त्यांनी सांगितले. “मायबोलीची भक्ती, मराठीचा सन्मान हीच महाराष्ट्राची खरी शक्ती” असल्याचा संदेश त्यांनी दिला.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, अभियान समन्वयक सल्लागार डॉ.ज्योती ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी रिक्षा टॅक्सी चालक बंधू-भगिनी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००
