भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री व मंत्री करणार ध्वजवंदन
मुंबई, दि. २१ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २१ जानेवारी २०२६ रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० च्या पूर्वी किंवा १० वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागामार्फत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
मुंबई येथील प्रमुख समारंभात मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे पालकमंत्री / मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजवंदन करतील.
ठाणे- उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे; पुणे-उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार; नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे; अहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील; सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील; नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन; पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक; जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील; अमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसे; यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड; मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा; रत्नागिरी- उदय स्वरुपा रवींद्र सामंत; धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल; जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे; नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे; चंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वूईके; सातारा- शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई; मुंबई (उपनगर)- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलार, वाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे; लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले; सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे; हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ; भंडारा- संजय सुशिला वामन सावकारे, छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, रायगड- भरत विठाबाई मारुती गोगावले; बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील); सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे; अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर; बीड- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील; कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर; गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल; वर्धा- डॉ.पंकज कांचन राजेश भोयर; परभणी- मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर; गोंदिया- इंद्रनील अनिता मनोहर नाईक आणि नंदुरबार- योगेश ज्योती रामदास कदम.
राष्ट्रध्वजवंदन करणारे पालकमंत्री / मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी राष्ट्रध्वजवंदन करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजवंदन समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.
राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणण्यात यावे अथवा वाजविण्यात यावे आणि त्यानंतर सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात यावे, असेही कळविण्यात आले आहे.
राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-1091/30, दिनांक 2 मार्च 1991 तसेच क्रमांक एफएलजी- 1091(2)/30, दिनांक 5 डिसेंबर 1991 तसेच क्रमांक एफएलजी 1098/ ध्वजसंहिता/30, दिनांक 11 मार्च 1998 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना तसेच आणिबाणीच्या कालावधीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्ती यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
०००००
