मद्रास विद्यापीठ व इथिराज कॉलेजतर्फे नागपूरचे समाजसेवक अरविंद कुमार रतूडी यांचा हरियाणात सन्मान
Summary
हरियाणा | प्रतिनिधी नागपूर (महाराष्ट्र) येथील सुप्रसिद्ध, हरफनमौला युवा समाजसेवक अरविंद कुमार रतूडी यांचा हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. तमिळनाडू येथील मद्रास विद्यापीठ (चेन्नई) व इथिराज कॉलेज यांच्या संचालिका (डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स), सुप्रसिद्ध समाजसेविका, माजी राष्ट्रीय बास्केटबॉल […]
हरियाणा | प्रतिनिधी
नागपूर (महाराष्ट्र) येथील सुप्रसिद्ध, हरफनमौला युवा समाजसेवक अरविंद कुमार रतूडी यांचा हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. तमिळनाडू येथील मद्रास विद्यापीठ (चेन्नई) व इथिराज कॉलेज यांच्या संचालिका (डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स), सुप्रसिद्ध समाजसेविका, माजी राष्ट्रीय बास्केटबॉल सिल्व्हर मेडल विजेत्या उपविजेती आणि सध्या भाजपच्या तमिळनाडू राज्य महासचिव डॉ. उमा देवी गौडा यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अंबानी ग्रुपद्वारे निर्मित व संचालित एमबीएस लगून, सिव्हिल सोसायटी, गुरुग्राम येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात रतूडी यांना चांदीची भगवान श्री गणेशाची मूर्ती व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. उमा देवी गौडा या तमिळनाडू राज्य सरकारकडून सन्मानित जांबाज पोलीस अधीक्षक स्व. श्री चन्नामलन गौडा यांच्या कन्या असून, कुख्यात गुन्हेगार वीरप्पनविरोधातील “ऑपरेशन वीरप्पन”मध्ये त्यांच्या वडिलांची महत्त्वाची भूमिका होती. डॉ. उमा देवी सध्या आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींसाठी मोफत शिक्षण व क्रीडाशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत.
अरविंद कुमार रतूडी यांना हा सन्मान गेल्या सुमारे ३० वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या निःशुल्क, निस्वार्थ, निर्भीक व निष्पक्ष समाजसेवेबद्दल देण्यात आला. सर्वधर्मीय, सर्वकर्मीय दृष्टीकोनातून समाजसेवा करताना त्यांनी देशभरात शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील व्यवसायीकरणाविरोधात आवाज उठवला आहे. तसेच विविध गंभीर व ज्वलनशील जनहित विषयांवर सर्वोच्च व उच्च न्यायालयांत जनहित याचिका दाखल केल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात नागपूरमध्ये अडकलेल्या देशातील विविध राज्यांतील नागरिकांना सुरक्षितपणे त्यांच्या राज्यांत परत पाठविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
सन्मान स्वीकारताना रतूडी म्हणाले, “जनसेवेसाठी भाषेचे ज्ञान नव्हे, तर राष्ट्रीय कर्तव्य, मानवता आणि इंसानियत महत्त्वाची असते. मी समाजसेवा कोणत्याही जाती, धर्म, पंथ, भाषा किंवा प्रांताच्या चौकटीत न अडकता राष्ट्रधर्म व मानवधर्म सर्वोपरि मानून करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन. भाषा अडथळा नसून त्या माणसांना जोडण्याचे काम करतात.”
हा सन्मान त्यांनी १९६२ च्या युद्धातील नायक असलेल्या त्यांच्या स्वर्गीय आई (एसएसबीमध्ये शस्त्र प्रशिक्षणिका) व वडील (सैन्य प्रशिक्षक व ब्लॉक कमांडर पीएलडी) यांना समर्पित केला.
या सन्मान सोहळ्यास महामंडलेश्वर श्री केदारेश्वर उर्फ बर्फानी बाबा (पिनाकी फाउंडेशन अध्यक्ष), आध्यात्मिक गुरु श्री अभिषेक शर्मा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुक्खू यांच्या भगिनी व समाजसेविका रजनी परमार, आचार्य श्री मोहन राकेश पुरोहित, अंबानी ग्रुप (उत्तराखंड)चे लीगल सेल हेड अॅड. रावत यांच्यासह धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
