BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

देश पारतंत्र्यात असताना जैन आचार्य जवाहरलाल महाराजांकडून लोकांमध्ये पुनर्जागृतीचे कार्य – राज्यपाल आचार्य देवव्रत आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशन

Summary

मुंबई, दि. 16 : जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये धर्म पुनर्जागृतीचे कार्य करीत असताना स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा तसेच टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना देण्याचे कार्य […]

मुंबई, दि. 16 : जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये धर्म पुनर्जागृतीचे कार्य करीत असताना स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा तसेच टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना देण्याचे कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र  व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

राज्यपाल श्री. देवव्रत तसेच पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आचार्य जवाहर लाल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील टपाल तिकिट व मुद्रेचे (नाण्याचे) प्रकाशन रविवारी (दि. १६) राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत  बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन जसकरण बोथरा फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.

भगवान महावीर तसेच विविध जैन संतांनी त्याग, तपस्या व परोपकाराच्या माध्यमातून समाजासाठी प्रेरणादायक काम केले. त्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह हे सिद्धांत मानवतेला दिले. जो काळाच्या कसोटीवर टिकतो तो सच्चा धर्म व जो टिकत नाही तो अधर्म असतो असे राज्यपालांनी सांगितले.

आचार्य जवाहर लाल यांनी देश पारतंत्र्यात असताना दहा हजाराहून अधिक सत्संगाच्या माध्यमातून जनजागरणाचे कार्य केले. त्यांनी लोकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरित केले. आचार्य जवाहर लाल यांनी अनेकांत वाद व अपरिग्रह ही तत्वे आयुष्यभर पाळली असे पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यावेळी म्हणाले.

आचार्य जवाहर लाल महाराज यांनी बालविवाह, हुंडा प्रथा, व्यसनाधीनता यांना तीव्र विरोध केला याचे स्मरण देताना त्यांच्यावरील नाणे व टपाल तिकीट लोकांना त्यांच्या कार्याचे चिरंतन स्मरण देतील, असे श्री. कटारिया यांनी सांगितले.

यावेळी जसकरण फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धांत बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह, जसकरण बोथरा फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धार्थ बोथरा व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *