मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ
मुंबई, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत कुलाबा विधानसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालय येथे झाला.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उपस्थित नागरिकांना महाऑनलाईन पोर्टलद्वारे प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. या विशेष शिबिरामध्ये नागरिकांकडून आधार विषयक सेवा, विविध दाखल्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले तसेच काही लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
नागरिकांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेज, अधिकृत चॅनेलला फॉलो करून शासनाच्या सेवांबाबत माहिती घेण्याचे तसेच सेवा पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले
कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, तहसिलदार संदीप आवारी, तहसिलदार अश्विनकुमार पोतदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.
०००
