महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

गायमुख ते फाउंटन रस्ता वाढविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Summary

मुंबई, दि. १३ :  दहिसर मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोसाठी उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रूट) प्रस्तावित आहे. या मार्गाखाली गायमुख ते फाउंटन 30 मीटरचा रस्ता 60 मीटरपर्यंत वाढविण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात विविध बैठकांचे […]

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. १३ :  दहिसर मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोसाठी उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रूट) प्रस्तावित आहे. या मार्गाखाली गायमुख ते फाउंटन 30 मीटरचा रस्ता 60 मीटरपर्यंत वाढविण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वन संरक्षक अनिता पाटील, अतिरिक्त महापालिका आयुक्त सचिन बांगर, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, उप अभियंता यतीन जाधव, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, गेल्या 30 वर्षात ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पुढील 30 वर्षांचा विचार करता या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराचा विकास करण्याचे काम चालू असून त्यामुळे वाहनांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. गुजरातला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ आणि नवी मुंबई, पुणे आणि मुंबई यांना जोडणारा घोडबंदर रस्ता हा महत्त्वाचा रस्ता ठरणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, दहिसर मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोच्या खालील मार्गाखाली 60 मीटर रुंद रस्त्याची योजना करण्यात यावी. या रस्त्याच्या मध्यभागातून मेट्रोचा उन्नत मार्ग जाईल. या संदर्भात भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. तसेच नागपूरमधील मॉडेलप्रमाणे रस्त्याचे नियोजन करावे, असेही मंत्री श्री. सरनाईक यांनी नमूद केले.

मीरा-भाईंदर महापालिकेने एक आठवड्याच्या आत वन विभागाकडे प्रस्ताव पाठवावा त्यानंतर वन विभाग मंजुरी बाबत कार्यवाही करेल. 30 मीटरचा रस्ता 60 मीटर करीत असताना संपादनाने बाधित होणाऱ्या लोकांना टिडीआरच्यामाध्यमातून खर्च मीरा-भाईंदर महानगरपालिका करेल व आर्थिक स्वरूपाचा खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करेल,  असे  निर्देश मंत्री. श्री. सरनाईक यांनी दिले.

प्रस्तावित रस्त्याला लागणाऱ्या एकूण जागेपैकी साधारणपणे १५ ते २० टक्के जागा ही वन विभागाची आहे, त्यामुळे वन विभागाची मान्यता येईपर्यंत खासगी जागेवर निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करणेबाबतही निर्देश देण्यात आले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *