BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ‘विकसित भारत २०४७’साठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण मुंबई दि 8 –  केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी […]

छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण

मुंबई दि 8 –  केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप व कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागाचे आयुक्त नयना गुंडे,  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्य आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, कुटुंबासह देशाच्या विकासासाठी महिलांचे योगदान  महत्त्वाचे आहे. आज सन्मानित करण्यात आलेल्या महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत. प्रधानमंत्री यांच्या निर्णयानुसार संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांमध्ये महिलांना काम करण्याची संधी दिली आहे आणि तिथेही त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.

विकसित भारतासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. 2029 पर्यंत राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे महाराष्ट्र हे ‘महिला राज्य’ होणार आहे.  2047 मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करताना महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरणार आहे.

सामाजिक बंधनातून खडतर प्रवास करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि महिलांसाठी केशवपन प्रथा बंद केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उत्तम प्रशासक होत्या. छत्रपती शिवाजी महाराज घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या अशा शक्तिरुपी स्त्रियांचा विचार आणि आदर्श घेऊन काम केल्यास प्रगती साध्य करता येईल.

लोकसंख्येत ५० टक्के महिला असून,  महिलांना केंद्रस्थानी ठेवून मानव संसाधन विकसित केल्यास देश विकसित होईल हे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ओळखले आणि म्हणूनच ‘लेक लाडकी’ ते ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘लखपती दीदी पर्यंत योजना सुरू करून त्या प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील बालविवाह बंद झाले आहेत आणि लिंगभेदाचे, भ्रूणहत्येचे प्रमाण कमी झाले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांनी सुरू केलेल्या क्रेडिट सोसायटीचा विस्तार वाढवून उद्योगात आपले अस्तित्व मजबूत करायचे आहे असे सांगून मुख्यमंत्री यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांचा प्रशासकीय सहभाग वाढविण्यासाठी विशेष ग्रामसभा

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच महिलांच्या शिक्षणातून त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. ही योजना यशस्वीपणे राबविण्यात महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरले आहे, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचा प्रशासकीय सहभाग वाढविण्यासाठी महिला दिनानिमित्त आज राज्यभर विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून, यापुढेही त्याचे आयोजन करण्यात येईल. उच्च शिक्षणात मुलींची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने विभाग काम करीत असून, शिक्षण क्षेत्रात मुलींची संख्या वाढविण्यात राज्य आघाडीवर असेल, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. आरोग्य, उद्योग, आर्थिक , सामाजिक क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लाडक्या बहिणीसाठी राज्यस्तरीय क्रेडिट संस्था स्थापणार

महिलांचे शिक्षण व समाजातील स्थान सुधारणे यासाठी ‘लेक लाडकी’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ यासारख्या सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितले. नागपूरच्या लाडक्या बहिणींनी नागपूर महिला सन्मान क्रेडिट सोसायटी सुरू केली, ज्याच्या माध्यमातून या महिला उद्योग सुरू करीत आहेत आणि इतर महिलांनाही सहकार्य करीत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या साहाय्याने राज्यस्तरीय क्रेडिट सोसायटी स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले ‘रूपे कार्ड’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस त्यात उपलब्ध आहे. याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्ससुद्धा मिळणार आहे. तसेच पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोडही देण्यात आला आहे. या कार्डचे यावेळी अनावरण करण्यात आले. देशात ‘रूपे कार्ड’ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.

राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव यांचा सन्मान

राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती केया हाटकर यांना कला व साहित्यसाठी, विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व केलेली प्रियंका इंगळे, राज्यातील पहिल्या महिला फायटर पायलट अंतरा मेहता, पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला अपूर्वा अलाटकर, डिझेल इंजिन चालवणारी पहिली महिला मुमताज काझी, महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडल्जी , पत्रकारिता क्षेत्रासाठी रूपाली बडवे,  70 वर्षीय सोशल मीडिया स्टार सुमन धामणे, नागपूरमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लभार्थ्यांनी एकत्र येऊन  महिला सन्मान क्रेडिट सोसायटी स्थापन केली. सोसायटीच्या अध्यक्ष संगीता चव्हाण, उपाध्यक्ष सचीता सोनी या महिला रत्नांचा  यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *