BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

सांस्कृतिक परंपरा व वैज्ञानिक विचारांचा संगम साधूनच समृद्ध भारताचा पाया” – आमदार चरणसिंग ठाकूर “आजची बालक-बालीका हेच २०४७ च्या समृद्ध भारताचे वास्तुशिल्पी” – आमदार चरणसिंग ठाकूर

Summary

कोंढाळी : प्रतिनिधी श्री संत गजानन महाराज ध्यान मंदिराच्या पवित्र प्रांगणात नवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक धर्मोत्सव व रास-गरबा, दांडिया महोत्सव उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सहभागी होऊन उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते […]

कोंढाळी : प्रतिनिधी
श्री संत गजानन महाराज ध्यान मंदिराच्या पवित्र प्रांगणात नवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक धर्मोत्सव व रास-गरबा, दांडिया महोत्सव उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सहभागी होऊन उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
नवरात्रीचे महत्व अधोरेखित
या प्रसंगी बोलताना आमदार ठाकूर म्हणाले –
“नवरात्री महोत्सव हा केवळ धार्मिक विधी वा परंपरा नसून, समाजातील एकात्मता, संस्कारांचे जतन व भारतीय संस्कृतीचे वैभव जपणारा उत्सव आहे. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना, मातृशक्तीचा गौरव, तसेच भक्ती व विज्ञान यांचा संगम. यामध्ये संगीत, नृत्य, कला, साधना आणि सामाजिक बंधुभाव यांचा अनोखा संगम दिसतो. त्यामुळे अशा उत्सवांमधून भावी पिढीला भारतीय संस्कृतीचे मोल समजते आणि त्या पिढीची जीवनदृष्टी घडते.”
बालके-बालीकांवर विशेष भर
आमदार चरणसिंह ठाकूर यांनी पुढे सांगितले –
“आजचे बालक-बालिका हेच २०४७ च्या समृद्ध भारताचे वास्तुशिल्पी आहेत. त्यांच्यातील ऊर्जा, कल्पकता, जिज्ञासा आणि नवनिर्मितीचा उत्साह यांचा योग्य वापर झाला तर भारत नक्कीच जगातील सर्वाधिक प्रगत, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक राष्ट्र ठरेल. गजानन महाराज ध्यान केंद्राच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण मिळत असल्याने बालकांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजत आहेत. वारकरी संप्रदायाने ‘ज्ञानदेव-तुकाराम’ पासून ‘समाजोद्धार व अध्यात्म’ यांची शिकवण दिली आहे. अशा संस्कारांमुळे मुले केवळ चांगले विद्यार्थी नव्हे तर जबाबदार नागरिक घडतील.”
विज्ञान व संस्कृतीचा सेतू
आपल्या भाषणात आमदार चरणसिंह ठाकूर यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा संबंध स्पष्ट केला. ते म्हणाले –
“भारतीय संस्कृती कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. उलट, आपल्या परंपरांच्या मुळाशी वैज्ञानिकता दडलेली आहे. नवरात्रातील उपवास हा केवळ धार्मिक नव्हे तर आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग आहे. ध्यान, कीर्तन, भजन, रास-गरबा हे मनशांतीसह शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्याचे साधन आहेत. विज्ञान आणि अध्यात्म यांचा असा सुंदर संगम समाजाला सर्वांगीण विकासाची दिशा देतो.”
जीवन आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या कार्याचा गौरव
आमदार चरणसिंह ठाकूर यांनी जीवन बहुउद्देशीय संस्थाचे संचालक जीवन जंवजाळ यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.
“ही संस्था समाजाला योग्य दिशा देत आहे. बालकांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता, त्यांना सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातही विकसित करण्याचे व्रत या संस्थेने घेतले आहे. अशा संस्थाच भारताला समृद्ध भारत बनवण्यात मोलाची भूमिका बजावतील,” असे ते म्हणाले. *उपस्थितांचा उत्स्फूर्त सहभाग*
या धर्मोत्सवात कोंढाळी नगरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, युवक-युवती तसेच हजारो महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी झालेल्या रास-गरबा व दांडिया स्पर्धेत बालकांपासून युवक-युवतींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. नृत्यातील ताल, भक्तीगीतांची माधुर्य आणि रंगीबेरंगी पोशाख यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते.
विशेष म्हणजे, कार्यक्रमानंतर लहान मुलांनी आमदार चरणसिंह ठाकूर यांच्यासोबत छायाचित्र घेण्यासाठी मोठा आग्रह धरला. यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.

संपूर्ण कार्यक्रम सुव्यवस्था साठी पोलिस निरीक्षक राजकुमार त्रिपाठी व उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे महोत्सव आनंदी, शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.
आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवाची अनुभूती

या भव्य आयोजनामुळे नवरात्री महोत्सवाला एक वेगळेच आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक समृद्धी, वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक एकात्मतेचा संगम साधणारा हा सोहळा कोंढाळीकरांसाठी अविस्मरणीय ठरला. या सोहळ्याचे प्रास्ताविक जीवन आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर चे अध्यक्ष जीवन जंवजाळ,संचालन मोहन पात्रिकर व कुणाल भांगे यांनी तर आभार विकास कामडी यांनी केले.
– अशा प्रकारे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रभावी भाषणाने केवळ उपस्थितांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला “सांस्कृतिक परंपरा आणि वैज्ञानिक विचारांचा संगम साधूनच समृद्ध भारताची उभारणी होऊ शकते” असा नवा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *