हिंद दी चादर कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा – अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील
ठाणे, दि. १२ (जिमाका): नवी मुंबई येथील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा 350 वा शहीदी समागम कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रचार, प्रसिद्धी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी दिले.
याबाबत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, तहसिलदार सचिन चौधरी, रेवण लेंभे, संदीप थोरात, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी घनश्याम मेहता, शिक्षण विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी तर दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घ्याव्यात. ग्रामपंचायत तसेच नगरपालिका विभागांनी स्वच्छता मोहीम राबवावी. ग्रामपंचायतींमध्ये लाऊड स्पीकरवरुन यासंदर्भातील गीत वाजवावे. चित्रपटगृहांमधूनही या गीताद्वारे कार्यक्रमाची प्रचार, प्रसिद्धी करावी. प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रचार, प्रसिद्धी करावी. आरोग्य विभागाने शाळांमध्येदेखील आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत.
‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिबीजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीबाबत सर्व विभागांनी नियोजन करुन, त्याची सुरुवात करावी. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही पाटील यांनी सांगितले.
०००
