BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यस्तरीय जनजागृती राबवा – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

Summary

मुंबई, दि. २२ : विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी मिशन वात्सल्य योजने अंतर्गत जनजागृती करण्यात येते.  मात्र काही प्रमाणात अद्यापही अशा कृप्रथा सुरू असल्याचे निदर्शनास आले असून, या प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन […]

मुंबई, दि. २२ : विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी मिशन वात्सल्य योजने अंतर्गत जनजागृती करण्यात येते.  मात्र काही प्रमाणात अद्यापही अशा कृप्रथा सुरू असल्याचे निदर्शनास आले असून, या प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करावे. तसेच अशा प्रथांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

विधवा प्रथा बंद करण्याच्या ठरावाच्या धर्तीवर राज्यभर केलेल्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त नैना गुंडे, सह सचिव वी. रा. ठाकूर, सह आयुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, विधवा महिलांनाही इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. या महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या हेतूने या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

मात्र, आजही काही ठिकाणी विधवा महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे तसेच विधवा महिलांना समाजातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ न देणे यांसारख्या कृप्रथांचे पालन होताना निदर्शनास येत आहे. यामुळे या महिलांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे.

या प्रथांना आळा घालण्यासाठी गाव पातळीवर तसेच शहरी भागात वॉर्डस्तरावर समिती गठीत करण्यात आल्या आहेत. या कृप्रथांना पूर्णविराम मिळावा म्हणून समितीच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत. नागरिकांना विधवा कृप्रथे संबंधित घटना घडताना आढळल्यास संबंधित तालुका व ग्रामस्तरीय समितीला संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले.

या समितीमध्ये ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामस्तरीय समितींची संख्या 36 हजार 205 व जिल्हास्तरीय वॉर्डस्तरीय समितींची संख्या 4909 इतकी असून, यामार्फत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *