BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर – सहकार मंत्री अतुल सावे

Summary

मुंबई, दि. 13 : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. […]

मुंबई, दि. 13 : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.

ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.

सन २०१७ – १८, २०१८ – १९ व २०१९ – २० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे. त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही  करण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही. अशा शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आचार संहिता संपल्यानंतर समाविष्ट केली जाणार आहेत, असेही सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *