पर्यावरण महाराष्ट्र रोजगार सातारा हेडलाइन

पर्यटन विकासातून रोजगार वृद्धीसाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Summary

सातारा, दि.13 (जि.मा.का) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चांगला विकास आराखडा सादर केला आहे.  जिल्ह्यातील पर्यटन क्षमता वृद्धिंगत करून त्याद्वारे रोजगार निर्मितीसाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे […]

सातारा, दि.13 (जि.मा.का) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चांगला विकास आराखडा सादर केला आहे.  जिल्ह्यातील पर्यटन क्षमता वृद्धिंगत करून त्याद्वारे रोजगार निर्मितीसाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

सातारा जिल्हा हा अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्ग संपदा लाभलेला संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याला 110 किलोमीटरचा कोयनेचा बॅकवॉटरचा पट्टा लाभला आहे. या जिल्ह्यात जंगले आहेत, प्राणी आणि पक्षी अभयारण्य आहेत, मंदिरे, गड, किल्ले, धबधबे, पठारे आहेत. अशा स्थितीत पर्यटनाचा विकास झाल्यास जिल्ह्यातून नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी जाणारा युवकाला आपल्याच जिल्ह्यात रोजगार उत्पन्न होईल या दृष्टीने या जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीच्या क्षमता ओळखून चांगला आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. जिल्ह्यातील तरुणांना आपल्याच गावात राहून रोजगार उपलब्ध व्हावा त्याला इतर शहरांमध्ये रोजगारासाठी जायला लागू नये. किंबहुना रोजगारानिमित्त इतर शहरात गेलेले तरुण पुन्हा आपल्या मायभूमीत परत यावेत, या उद्देशाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाच्या माध्यमातून दिली जाईल, असे श्री.  शिंदे म्हणाले.

श्री. शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे वाढवत आहोत. अनेक वर्षापासून रखडलेल्या तापोळा पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बामणोली ते दरे आणि आपटी ते तापोळा अशा दोन पुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी हे पूल अत्यंत महत्त्वाचे ठरतील आणि याचा फायदा पर्यटन वाढीलाही होईल. महाबळेश्वर तापोळा रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण सुरू आहे मुनावळे येथे पर्यटकांसाठी आकर्षण स्थळे विकसित करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. रोजगारासाठी युवकांना उद्युक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व शासन प्रयत्नशील आहे. या जिल्ह्यात बांबू लागवड उपक्रम मिशन मोडवर हाती घेण्यात आला असून याचा शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी फायदा होईल यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घ्यावा.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *