खुर्सापार येथे “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेऊ” मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

कोंढाळी/ (प्रतिनिधी):
पंचायत समिती काटोल अंतर्गत खुर्सापार ग्रामपंचायतीमध्ये १ मे २०२५ रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत *”कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेऊ”* या विशेष मोहिमेचा उत्साहात शुभारंभ झाला. या मोहिमेचा शुभारंभ आमदार चरणसिंग ठाकूर काटोल विधान सभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या अभियानाचा उद्देश गावांमधील जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यातून दर्जेदार सेंद्रिय खत निर्माण करणे व ग्रामपंचायतींमध्ये दीर्घकालीन व शाश्वत स्वच्छता निर्माण करणे हा आहे.
या वेळी काटोल तालुक्यातील मेंटपांजरा, पारडी गोतमारे, लिंगा, हाताला, सिरसावाडी, रिधोरा आणि दिग्रस या ग्रामपंचायतींमध्येही मोहिमेचा एकत्रित शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १० मे २०२५ पर्यंत कंपोस्ट खड्डे तांत्रिकदृष्ट्या भरून त्यांचा प्रभावी उपयोग सुनिश्चित केला जाणार आहे.
कार्यक्रमास खुरसापार ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाताई कातलाम, उपसरपंच विनायक साठे, माजी सरपंच सुधीरभाऊ गोतमारे, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी रामदास गुंजारकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता शैलेंद्र कवाडे, कनिष्ठ अभियंता संकेत उमप, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे निखिल रौंदळकर, ग्राम विकास अधिकारी जया पाटील, गट संसाधन केंद्राचे राजू निनावे, अंगद डफर, अनिकेत शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत गावांमध्ये स्वच्छतेसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी या सुविधांचा नियमित वापर करून आपले गाव कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी. मोहिमेच्या कालावधीत ग्रामपंचायतींमध्ये बांधण्यात आलेले कंपोस्ट खड्डे पूर्ण क्षमतेने भरून त्यातून जैविक खतनिर्मिती करण्यात यावी.
हा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेऊ’ हे अभियान १ मेपासून राबविले जातआहे आहे. खुरसापार ग्रामपंचायतीचा आदर्श घेत तालुक्यातील इतर सर्व ग्रामपंचायतींनी १० मे २०२५ पर्यंत खड्डे भरून योग्य व्यवस्थापन करावे. लोकसहभागातून दृश्यमान स्वच्छता निर्माण करणे आणि शाश्वत स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक आहे, असे मत मा. आमदार श्री. चरणसिंग ठाकूर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.