BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

कीटकांच्या मदतीने रोखणार जलपर्णी

Summary

लाखनी. शहरातील ऑक्सिजन पार्क तलाव हा जलकुंभी (इकॉर्निया) आणि सालव्हनिया मोलेस्टा या उपद्रवी जलतणांनी व्यापला आहे. या अतिक्रमणामुळे जलचर सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले असून मत्स्योत्पादन तसेच मासेमारीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या गंभीर समस्येवर उपाय […]

लाखनी. शहरातील ऑक्सिजन पार्क तलाव हा जलकुंभी (इकॉर्निया) आणि सालव्हनिया मोलेस्टा या उपद्रवी जलतणांनी व्यापला आहे. या अतिक्रमणामुळे जलचर सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले असून मत्स्योत्पादन तसेच मासेमारीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून जिल्हा प्रशासन आणि कृषी विज्ञान केंद्र, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने नियंत्रित जैविक उपाययोजना राबविण्यात येत आहे. रविवारी (दि. 25) या उपक्रमांतर्गत निओचेटीना ब्रुची व सिर्टोबँगस सॅलव्हनिया या दोन कीटकांची प्रयोगात्मक सोडणी करण्यात आली.

जैविक कीटकांचा निर्मूलनासाठी

वापर : निओचेटीना ब्रुची हा कीटक केवळ जलकुंभीवरच आपले जीवनचक्र पूर्ण करतो. त्याच्या अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थांमधून जलकुंभीच्या रसावर तो आपले पोषण घेतो. त्यामुळे या कीटकाच्या माध्यमातून जलकुंभीचा प्रादुर्भाव कमी करण्याची मोठी आशा आहे. या जैविक उपाययोजनेमुळे जलकुंभीचे नियंत्रण शक्य होणार असून रासायनिक तणनाशकांपासून निर्माण होणाऱ्या हानिकारक परिणामांना आळा बसणार आहे.

ऑक्सिजन पार्क तलावात जैविक उपाययोजना

निओचेटीना ब्रुची हा कीटक केवळ जलकुंभीवरच अवलंबून असतो. त्यामुळे

पर्यावरणाला इजा न पोहोचवता, जलकुंभी निर्मूलनाचा हा सर्वात सुरक्षित मार्ग ठरेल. जलकुंभी व्यवस्थापनासाठी जैविक उपाययोजना ही काळाची गरज आहे. यामुळे जलजैवविविधतेचा समतोल राखण्यास मदत होईल.

– डॉ. उषा डोंगरवार, प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, साकोली

 

उपक्रमाचे यशस्वी पाऊल डिसेंबर 2024 मध्ये या उपक्रमाचा प्रारंभकरण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक नदी, तलाव आणि जलाशयांतील जलकुंभीचे प्रभावी नियंत्रण करण्यात आले आहे. लाखनीतील ऑक्सिजन पार्क तलाव हा पुढील पायरी म्हणून निवडण्यात आला आहे. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. ऊषा डोंगरवार (प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ), डॉ. प्रशांत उंबरकर (कीटशास्त्रज्ञ), राजेश गायधनी, तालुका कृषी अधिकारी राठोड, चेतना वनवे, अनिल पचारे, ताराचंद पचारे यांच्यासह सृष्टी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

जलकुंभीचा धोका : पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतल्यामुळे जलचर जीवांसाठी घातक असून पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यास अडथळा निर्माण करते. डासांसारख्या कीटकांच्या वाढीस पोषक असून जलजैवविविधता आणि मत्स्योत्पादनावर प्रतिकूल परिणाम करते. जलकुंभी ही जलतणांपैकी एक अत्यंत वेगाने वाढणारी वनस्पती असून वर्षभरात 3000 हून अधिक बियांची निर्मिती करू शकते. या बियांना 20 वर्षांपर्यंत आयुष्य असते. शिवाय ही वनस्पती पाण्यावर तरंगणारी असल्यामुळे तिचा प्रसार झपाट्याने होतो. रासायनिक तणनाशके महागडी आणि पर्यावरणासाठी हानिकारक ठरतात, त्यामुळे जैविक नियंत्रण हीच उत्तम पर्याय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *