BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

आदिवासींच्या हक्कासाठी सुधीरभाऊंचा विधानसभेत एल्गार! पेसा भरती आणि निधीच्या मुद्द्यावरून सरकारला धरले धारेवर

Summary

​चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासी युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार; मंत्री आशिष शेलार यांनी दिले समिती स्थापन करण्याचे आश्वासन! ​मुंबई/चंद्रपूर: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा विधानसभेत रणशिंग फुंकले आहे. पेसा (PESA) कायद्यांतर्गत प्रलंबित […]

​चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासी युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार; मंत्री आशिष शेलार यांनी दिले समिती स्थापन करण्याचे आश्वासन!
​मुंबई/चंद्रपूर:
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा विधानसभेत रणशिंग फुंकले आहे. पेसा (PESA) कायद्यांतर्गत प्रलंबित असलेली पदभरती, आदिवासी निधीचे थेट हस्तांतरण आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराचा मुद्दा त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत प्रभावीपणे मांडला. मुनगंटीवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारने या प्रश्नांवर तातडीने समिती स्थापन करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
​प्रशासकीय दिरंगाईवर मुनगंटीवार यांचा प्रहार!
​सभागृहात बोलताना आ. मुनगंटीवार यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या आडमुठ्या धोरणाचे वाभाडे काढले. “अनेकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून आदिवासी भागातील कामे अडवली जातात. न्यायालयीन निर्णय होऊनही अंमलबजावणी का होत नाही?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. पेसा अंतर्गत पदभरती रखडल्याने आदिवासी तरुण रोजगारापासून वंचित राहत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
​’संयुक्त स्थायी समिती’ची आग्रही मागणी
​चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील भौगोलिक परिस्थिती आणि मोठी आदिवासी लोकसंख्या लक्षात घेता, पेसा गावांच्या विकासासाठी स्वतंत्र नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. निधीचे नियोजन, थेट निधी हस्तांतरण आणि रोजगाराच्या संधींवर लक्ष ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची ‘संयुक्त स्थायी समिती’ स्थापन करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
​सरकारची सकारात्मक साद; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत!
​मुनगंटीवार यांच्या मागणीला उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी आदिवासींच्या हक्कासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही जर कोणी अधिकारी कामात अडथळा आणत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. पेसा नियुक्त्यांबाबत तातडीने बैठक घेऊन निधी हस्तांतरणाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच लवकरच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.
​आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण
​आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजात समाधानाचे वातावरण असून, प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागतील अशी आशा पल्लवित झाली आहे.
​वृत्त संकलन: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 090222 44767

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *