क्राइम न्यूज़ पर्यावरण भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

सनफ्लॅग कंपनीत भ्रष्टाचार, शोषण आणि पर्यावरणाचा विध्वंस — चौकशीची मागणी तीव्र

Summary

भंडारा, प्रतिनिधी | मोहाडी तालुक्यातील वरठी गावात कार्यरत असलेल्या सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी विरोधात आर्थिक भ्रष्टाचार, कामगार शोषण, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि CSR निधीच्या गैरवापराबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. स्थानिक ग्रामस्थ, माजी कामगार व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची […]

भंडारा, प्रतिनिधी |
मोहाडी तालुक्यातील वरठी गावात कार्यरत असलेल्या सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी विरोधात आर्थिक भ्रष्टाचार, कामगार शोषण, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि CSR निधीच्या गैरवापराबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. स्थानिक ग्रामस्थ, माजी कामगार व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी एकमुखी मागणी केली आहे.

कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये बोगस बिले तयार करून मशिनरी खरेदी, देखभाल व कच्चा मालाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. बनावट दरपत्रकांचा वापर करून अधिक दराने साहित्य खरेदी दाखवून कंपनीच्या निधीचा अपव्यय झाल्याचे आरोप आहेत.

कामगारांच्या हक्कांची पायमल्ली

कंपनीत काम करणाऱ्या मजुरांना ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करायला लावले जाते, मात्र त्यानुसार मोबदला दिला जात नाही. काही कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. सुरक्षेच्या उपायांची कमतरता असल्याने अनेक अपघात झाल्याच्या तक्रारी आहेत.

पर्यावरणाचे गंभीर नुकसान

कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे व रासायनिक पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व शेतजमिनी दूषित झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक असून, नागरिकांना श्वसनाचे त्रास, त्वचा विकार व डोळ्यांचे आजार होत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

CSR निधीच्या वापराबाबत संशय

सनफ्लॅग कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत स्थानिक पातळीवर विकासकामे करणे अपेक्षित होते. मात्र, शाळा, आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा किंवा रस्ते अशा क्षेत्रात कोणतीही ठोस मदत करण्यात आलेली नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे CSR निधीचा वापर कुठे आणि कसा झाला, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

प्रशासनाकडे निवेदन, जनहित याचिकेची शक्यता

या सर्व प्रकारांबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर योग्य ती कारवाई झाली नाही तर जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जनतेची अपेक्षा – त्वरित कारवाई करावी

सनफ्लॅग कंपनीवर लागलेले आरोप अत्यंत गंभीर असून, यामुळे फक्त आर्थिकच नव्हे तर सामाजिक व पर्यावरणीय हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी जनतेची एकमुखी मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *